Tuesday, November 28, 2023

मैत्र दिवाळी अंक


        संपादक शोभा बोल्ली यांच्या #लोकमंगल_मैत्र दिवाळी अंकात एक कथा प्रकाशित झाली आहे. 'वामन मोरेचं नेमकं काय झालं? ही एक दीर्घकथा आहे.कथेचे लेखक सीताराम सावंत आहेत.हे नाव मला तरी नवीन आहे.
        ही कथा तीन अंगाने लिहिली आहे.वामन मोरे आत्महत्या करतो.आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीबद्दल समाजात अनेक तर्क वितर्क केले जातात.खरे कारण माहित असूनही अनेक काल्पनिक कारणावर खलबते केली जातात.आज गॉसिप करणे हाही करमणुकीचा एक भाग आहे. समाज अशा मृत व्यक्तीच्या मरणात सुध्दा आनंद घेताना दिसतो.सुशांत राजपूतचे उदाहरण आपल्या समोर आहेच.उगीच नको ती कल्पना करायची.कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचे व आनंद घ्यायचा.ही एक विकृती आहे आणि आज ही खूप मोठ्या प्रमाणात बळावली आहे.यात दुबळ्या व्यक्तीचा बळी दिला जातो.त्यातही स्त्रीला जबाबदार धरण्याची प्रवृत्ती ज्यादा दिसून येते.आजचा समाज असंवेदनशील झाला आहे का? मुख्य प्रसार माध्यमे ही चर्चा सतत चघळत राहतात. हे नेहमीचे झाले आहे.
        वामन मोरे आत्महत्या करतो.लेखक आत्महत्ये मागील कारणांची शोधाशोध करतो.तो तीन अंगांनी ही कथा लिहितो.थोडक्यात तीन कथा लिहितो व मनोरंजन करतो.
पहिले कारण
        बायको आणि आई यांच्यातील भांडणाला कंटाळून,बायकोच्या आक्रस्ताळी स्वभावाला आवर घालता न आल्याने हतबल झालेला वामन, आजारी आईची सेवा न करता आल्यामुळे हीन भावनेने भरलेला.कुठलाच पर्याय शिल्लक नसल्याने शेवटचा निर्णय म्हणून आत्महत्या केलेला.
दुसरे कारण
       सुंदर बायकोवर खूप प्रेम करणारा वामन,तिच्यावर भाबडा विश्वास असलेला,परंतु तिच्या बाहेरख्याली स्वभावामुळे दुःखी झालेला,सामाजिक प्रतिष्ठा वाचावी म्हणून काळजी करणारा.थोडक्यात बायकोच्या लफड्याला वैतागून आत्महत्या करणारा.
तिसरे कारण
    ऑफिसमधील एका विधवा,सेक्सी बाईच्या नादी लागून ब्लकमेकिंगला बळी पडलेला,आपली प्रतिष्ठा गमावण्याच्या भीतीने आत्महत्या केलेला.
        लेखकाने आत्महत्येची तीन कारणे शोधली आहेत.या तिन्ही कारणात आत्महत्या केलेल्या मोरेला दोषी न ठरवता या तिन्ही कथेत बाईला जबाबदार धरले आहे.म्हणजे आत्महत्येस कोणतीतरी स्त्री जबाबदार आहे.ही एक पुरुष प्रधान विचारधारा आहे.पुरुष अशा गोष्टीला जबाबदार नसतो.ठपका ठेवतांना सॉफ्ट टार्गेट ठरविले जाते.आणि स्त्री हे सॉफ्ट टार्गेट दिसते.
        लेखक समाजमन ओळखून कथा लिहितो.मोरे कुठेच कसा चुकत नाही.प्रत्येक वेळेला तो चांगला आहे पण त्याला भेटलेली बाई वाईट आहे ही भावना सार्वजनिक का आहे.कथा मोठी रंजक आणि जिज्ञासा वाढविणारी आहे.कारण आपण सुधा अशा कथेत रस घेणारे वाचक असतो.आपल्याला ही असे विषय चगळण्याची सवय असते.रहस्य आणि उत्कंठा कथेत जपली आहे.दीर्घ कथा असूनही कंटाळवाणी होत नाही.भाषा शैलीत वेग जपला आहे.
        या अंकातील लेख,संवाद आणि अनुवाद हे सदर खूप वाचनीय आहेत.
संवाद सदरातील रामदास भटकळ आणि कौतुकराव ठाले पाटील यांची मुलाखत मनोरंजन आणि ज्ञानवर्धक आहे.सुभाष देशमुख यांची मुलाखत सामाजिक बांधिलकी दर्शविणारी आहे.
लेख सदरातील सारे लेख नावीन्यपूर्ण माहिती देतात. तलत मेहमूद यांच्या जीवनावरील लेख वाचून त्यांचा अभिनय आणि गायकीचा संघर्ष यांची माहिती मिळते.सुलभा पिशवीवर यांचा लेख कुमार गंधर्व यांच्या गायकीचा परिचय करून देणारा आहे.
अनुवादित कथा छान आहेत.
    कविता भाग एक व दोन,दीर्घकथा,कथा हे भाग ही उत्तम झाले आहेत.एकंदरीत अंक सुंदर झाला आहे.अभिनंदन.....!!!!

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home